उदगीर शहर अवैध धंद्याचे माहेरघर बनत चाललेय - आ. अमित देशमुख
उदगीर (प्रतिनिधी)
सध्या हप्तेखोरी आणि दादागिरी च्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क मारले जात असल्याचा झणझणीत आरोप राज्याचे माजी वैद्यकीय मंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
उदगीर मध्ये गुटखा, मटका, कब्जा करणे, अवैध दारू विक्री यामुळे ग्रामीण भागात हैदोस माजला आहे. गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. मात्र शासनाला याकडे पाहायला वेळ नाही. कधीकाळी लातूर पॅटर्न हा शिक्षणाच्या संदर्भामध्ये होता. आपली मुले शिकली पाहिजेत, आपल्या मुलांचे भविष्य बनलं पाहिजे. हा उदात्त दृष्टिकोन होता. मात्र दुर्दैवाने त्या दृष्टिकोनाकडे कोणीही पाहत नाही. कदाचित सत्ताधारी मंडळी या अवैध धंदेवाल्याकडून हप्ते घेत असतील, अशी शंका मी यापूर्वी ही व्यक्त केली होती. त्यात तथ्य असावे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि लोक तसेच स्पष्ट बोलू लागले आहेत. असेही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

Post a Comment
0 Comments